
बीडमध्ये मुस्लीम बांधवांचा माणुसकीचा आदर्श; NTA च्या नियोजनावर गंभीर प्रश्नचिन्ह
📍 बीड | प्रतिनिधी
देशभरात ३ मे २०२६ रोजी पार पडलेल्या ‘NEET UG’ परीक्षेनंतर नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या (NTA) कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. परीक्षा यशस्वी झाल्याचा दावा करणाऱ्या NTA ला परीक्षा केंद्राबाहेर उभ्या असलेल्या पालकांसाठी मूलभूत सुविधा पुरवता न आल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
माजलगावचे समाजसेवक तथा अॅडव्होकेट खलील शेख यांनी या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेत NTA वर जोरदार टीका केली आहे.
📊 ३६४ कोटींची फी, तरीही सुविधा शून्य?
NTA च्या अधिकृत आकडेवारीनुसार, यंदा NEET परीक्षेसाठी तब्बल २२,७५,०११ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. सरासरी १६०० रुपये फी गृहीत धरल्यास, सुमारे ३६४ कोटी रुपये जमा झाले आहेत.
इतकी मोठी रक्कम असूनही, परीक्षा केंद्राबाहेर तासन्तास उभ्या असलेल्या पालकांसाठी सावली, पिण्याचे पाणी किंवा बसण्याची साधी व्यवस्था देखील करण्यात आली नव्हती. यावरून प्रशासनाच्या नियोजनातील ढिसाळपणा उघड झाल्याची टीका होत आहे.
दरम्यान, बीड जिल्ह्यात मात्र वेगळे चित्र पाहायला मिळाले. प्रचंड उष्णतेत त्रस्त झालेल्या पालकांसाठी स्थानिक मुस्लीम बांधवांनी मदतीचा हात पुढे केला.
जवळील मशिदीचे दरवाजे सर्वधर्मीय पालकांसाठी खुले करण्यात आले. बसण्यासाठी थंड जागा, पिण्याचे पाणी आणि पंख्यांची सोय करून त्यांनी माणुसकीचा आदर्श घालून दिला.
“विद्यार्थ्यांकडून कोट्यवधी रुपये घेतले जातात, मग या पैशांचा उपयोग नेमका कुठे होतो?” असा थेट सवाल अॅड. खलील शेख यांनी उपस्थित केला आहे.
तसेच, जमा झालेल्या निधीचा सविस्तर हिशोब सार्वजनिक करावा आणि संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
“एकीकडे NTA आपली पाठ थोपटून घेत आहे, तर दुसरीकडे पालकांना उन्हात उभे राहावे लागले. बीडच्या मुस्लीम बांधवांनी दाखवलेली माणुसकी कौतुकास्पद आहे. मात्र प्रशासनाचा हलगर्जीपणा आता सहन केला जाणार नाही.”
— अॅडव्होकेट खलील शेख