
अलीम इनामदार,मुंबई :
कुरार पोलीस ठाण्याने तीन अल्पवयीन मुलांचा अवघ्या ८ तासांत शोध घेऊन त्यांना सुरक्षितपणे त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केले आहे. या तत्पर कारवाईमुळे पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी श्री. त्रिनाथ कुमार नाथ (वय ४४ वर्षे) यांनी २७ मार्च २०२६ रोजी कुरार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यांचा मुलगा कु. रूद त्रिनाय नाथ (वय १३ वर्षे) व त्याचे दोन मित्र कु. जय जितेंद्र विश्वकर्मा आणि कु. सुमीत शैलेन्द्र कुमार वर्मा (दोघेही वय १३ वर्षे) हे सकाळी सेंट जॉर्ज स्कूल, कुरारगाव येथे गेले होते. मात्र अपेक्षित वेळेत घरी परत न आल्याने अपहरणाची शंका व्यक्त करण्यात आली.
या प्रकरणी कुरार पोलिसांनी गुन्हा नोंद करून तात्काळ तपास सुरू केला. शाळेतील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले तसेच तांत्रिक व पारंपरिक पद्धतींचा वापर करून शोधमोहीम राबविण्यात आली.
तपासादरम्यान संबंधित तीनही मुले मुलुंड रेल्वे स्टेशन परिसरात सुरक्षित अवस्थेत आढळून आली. त्यानंतर मुलांचे व पालकांचे जबाब नोंदवण्यात आले. कोणतीही संशयास्पद बाब आढळून न आल्याने मुलांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले.
ही कामगिरी पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली कुरार पोलीस ठाण्याच्या मिसिंग पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.
कुरार पोलिसांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला असून नागरिकांकडून पोलिसांचे कौतुक करण्यात येत आहे।
सदरची कामगिरी मा.श्री. देवेन भारती, पोलीस आयुक्त बृहन्मुंबई, मा.श्री. सत्यनारायण चौधरी, सह पोलीस आयक्त (का.व यु.), मा.श्री. शशीकुमार मिना, अप्पर पोलीस आयुक्त, उत्तर प्रादेशिक विभाग, मा. श्री. महेश चिमटे पोलीस उपआयुक्त परिमंडळ १२, व मा. श्री. कैलास बर्वे, स.पो. आ. समतानगर विभाग, श्री. उमेश पाटील, प्र. वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली कुरार पोलीस ठाण्याचे मिसींग पथक अधिकारी म.स.पो.नि. श्रीमती. अनिता होडगे, मपोउनि. श्रीमती. कांताबाई बहुरे, पोह. श्री. सागर पवार (तांत्रिक मदत), पोशि. श्री. संदिप कोकणी, पोशि. श्री. अदित्य तुपे, मपोशि. श्रीमती. तृप्ती थोरात अश्या पोलीस पथकाने पार पाडली.
