
अलीम इनामदार (मुंबई),
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘एन’ विभागाच्या हद्दीत पूर्व व पश्चिम यांना जोडणारा विद्याविहार रेल्वे स्थानकावरील उड्डाणपूल बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने उभारण्यात येत आहे. या उड्डाणपुलाचे बांधकाम वेगाने प्रगतिपथावर आहे. या उड्डाणपुलाच्या कामाची अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. अभिजीत बांगर यांनी प्रत्यक्ष पाहणी केली.
🔹या पूल प्रकल्पाचे संपूर्ण कामकाज दिनांक २५ जून २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. पुलाच्या पूर्व बाजूकडील सर्व कामे दिनांक २८ फेब्रुवारी २०२६ पर्यंत पूर्ण केली जातील. तसेच, पुलाच्या पश्चिम बाजूकडील बाधित निवासी व वाणिज्य बांधकामे हटविणे तसेच रस्तारेषा (Road alignment) नव्याने निश्चित करण्याची प्रक्रिया तातडीने पूर्ण करून उड्डाणपूलाच्या कामाला गती द्यावी. येऊ घातलेल्या पावसाळ्याचा विचार करता, पुलाची सर्व आवश्यक कामे दिनांक ३१ मे २०२६ पूर्वी पूर्णत्वास नेण्याचे नियोजन करावे. कामांचे उप अंगे निहाय सूक्ष्म नियोजन करून त्याची काटेकाेरपणे अंमलबजावणी करावी, असे स्पष्ट निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. अभिजीत बांगर यांनी दिले आहेत.
🔹बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘एन’ विभागाच्या हद्दीत, घाटकोपर परिसरात पूर्वेकडील रामचंद्र चेंबूरकर मार्ग आणि पश्चिमेकडील लालबहादूर शास्त्री मार्ग यांना जोडण्यासाठी विद्याविहार रेल्वे स्थानकाच्या रुळावरून जाणारा उड्डाणपूल महानगरपालिकेच्या पूल विभागाच्या वतीने उभारण्यात येत आहे. हा उड्डाणपूल एकूण दोन मार्गिकांचा आहे. उड्डाणपुलाच्या पूर्व बाजूकडील कामे सध्या अंतिम टप्प्यात आहेत. पूर्व बाजूचा पोहोच मार्ग (Solid Approach) पूर्ण करणे तसेच पुलाच्या संपूर्ण भागाचे पृष्ठीकरण (Surfacing) यासह सर्व कामे दिनांक २८ फेब्रुवारी २०२६ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहेत. यासाठी कामकाजाचे सूक्ष्म व टप्पानिहाय नियोजन करण्यात येणार आहे.
🔹पश्चिम बाजूकडे आतापर्यंत सहा खांबांची उभारणी पूर्ण झाली असून उर्वरित चार खांबांची उभारणी, पुलाचा आडवा अंतरभाग (स्पॅन), पोहोच मार्ग आदी कामे प्रलंबित आहेत. ही कामे करताना वाहतूक वळविणे (Diversion) हे मोठे आव्हान आहे. त्यामुळे कामकाज सुरू असतानाच वाहतुकीसाठी अधिकाधिक जागा उपलब्ध होईल, या दृष्टीने पुलाच्या दोन्ही बाजूकडील रस्त्यांची कामे प्रथम पूर्ण करण्यात येतील. त्यानंतर पुलाच्या उर्वरित कामांमध्ये बाधित निवासी व वाणिज्य बांधकामे हटविणे तसेच रस्तारेषा (Road alignment) नव्याने निश्चित करणे आदी बाबी पूर्ण केल्या जातील. या दोन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उड्डाणपुलाच्या कामांना लक्षणीय गती येईल.
🔹प्रमुख अभियंता (पूल) श्री. उत्तम श्रोते यांच्यासह संबंधित अधिकारी, अभियंते यावेळी उपस्थित होते.