
अलीम इनामदार,(मुंबई )
मुंबई महानगरपालिकेच्या वॉर्ड क्रमांक 51 आणि 54 मध्ये 2023-24 आर्थिक वर्षात करण्यात आल्याचा दावा असलेल्या तब्बल 20 कोटी रुपयांच्या विकासकामांवर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. स्थानिक नागरिकांनी या कामांमध्ये व्यापक गैरव्यवहार व भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप करत मनपा प्रशासनाकडे औपचारिक तक्रार दाखल केली आहे.
तक्रारदारांच्या मते, फक्त पंधरा दिवसांत विकासकामांचा आढावा, विभागीय अंदाजपत्रके, मंजुरी प्रक्रिया, ठेकेदार नियुक्ती, कामांची अंमलबजावणी, गुणवत्ता पडताळणी आणि देयके अदा करणे—ही संपूर्ण प्रशासकीय साखळी पूर्ण होणे व्यवहारात अशक्य आहे. एवढ्या कमी कालावधीत एवढ्या मोठ्या प्रमाणावर कामे कशी पूर्ण झाली, हा मूलभूत सवाल उपस्थित करण्यात आला आहे.
तक्रारीसोबत जोडलेल्या माहिती अधिकारातील कागदपत्रांमध्ये प्रत्येक फाईलमध्ये त्रुटी असून, चुकीचे माहितीपत्रक, आधीच्या कामांची छायाचित्रे, तसेच प्रत्यक्षात न झालेल्या कामांचे दस्तऐवजीकरण असल्याचा आरोप करण्यात आला आहे. स्थानिकांनी स्थळ पाहणी केली असता अनेक ठिकाणी कोणतेही काम झाले नसल्याचे समोर आल्याचे तक्रारीत नमूद आहे.
“ही बाब केवळ 20 कोटींच्या भ्रष्टाचारापुरती मर्यादित नसून, याची व्याप्ती त्यापेक्षा अधिक असण्याची शक्यता आहे. जबाबदार अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा नोंद करून स्वतंत्र चौकशीचे आदेश द्यावेत,” अशी मागणी झोपडपाट्टी महासंघ उपाध्यक्ष गणेश शिंदे यांनी केली आहे.
या आरोपांबाबत मनपा प्रशासनाकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र या प्रकरणामुळे वॉर्ड 51 आणि 54 मधील विकासकामांच्या पारदर्शकतेवर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.